शार्क टॅंक इंडिया : कारच्या गॅरेजपासून भारतातील आघाडीची लेन्सकार्ट कंपनी बनवण्यापर्यंतचा पीयूष बन्सल यांचा प्रवास
लेन्सकार्ट कंपनीचे संस्थापक म्हणून पीयूष बन्सल यांना ओळखले जाते. मालेगावच्या जुगाडू कमलेशच्या स्टार्टअप मध्ये गुंतवणूक केल्यामुळे ते चर्चेत आले होते.
लेन्सकार्ट कंपनीचे संस्थापक पियुष बन्सल हे सर्वानाच माहित असतील. शार्क टॅंक इंडियाच्या पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागातही ते शार्क्स म्हणून आले आहेत. त्यांनी शार्क टॅंकच्या पहिल्या भागात १३ स्टार्टअप मध्ये गुंतवणूक केली होती. पियुष यांनी मालेगावच्या जुगाडू कमलेशच्या कंपनीत केलेली गुंतवणूक चर्चेचा विषय ठरली होती. यावेळच्या शार्क टॅंक इंडियाच्या सिझन 2 साठी लेन्सकार्ट कंपनीने जाहिरात प्रयोजकत्व घेतले आहे. लेन्सकार्ट कंपनीची स्थापना २०१० मध्ये करण्यात आली होती.
पियुषचे शाळेचे शिक्षण दिल्ली येथील डॉन बॉस्को स्कुल मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर इंजिनिअरिंगच्या पुढील शिक्षणासाठी त्यांनी कॅनडा मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांनी मॅकगिल विद्यापीठ, कॅनडा येथे प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी घरची परिस्थिती सामान्य असल्यामुळे पार्ट टाइम काम करून पियुष यांनी शिक्षण घेतले. ते १८ ते २० तास काम करायचे. त्यांनी काम केले तरच घरचा आणि कॉलेजचा खर्च भागत होता. पियुष यांनी पार्ट टाइम कामाला रिसेप्शनिस्ट पासून सुरुवात केली आणि नंतर कोडींगचा जॉब करायला लागले.
येथे काम करत असताना त्यांना ग्राहकांना नेमके काय हवे असते पियुष यांना कळायला लागले. त्यानंतर कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला पियुष यांनी मायक्रोसॉफ्ट मध्ये इंटर्नशिपला पाहायला सुरुवात केली. त्यांना पहिल्या प्रयत्नात अपयश आले. नंतर चांगले प्रयत्न केल्यामुळे दुसऱ्या वर्षी त्यांना इंटर्नशिप मिळाली. अमेरिकेतील सिएटल मध्ये त्यांना मायक्रोसॉफ्ट कंपनीत नोकरी लागली. यावेळी त्यांना या कंपनीचे सगळेच लोक उत्पादन वापरत असल्याचे दिसून आले. एखादी समस्या पाहून त्यावर काम केले की कंपनीचा विस्तार वाढत जातो हे पियुष यांना काम करताना समजले.
त्यानंतर स्वतःला जग बदलायचय या विचारांमुळे त्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाने त्यांच्या करिअरला खऱ्या अर्थाने वळण मिळाले. २००८ मध्ये भारतात कार गॅरेज पासून त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. यादरम्यान त्यांना अमित चौधरी आणि सुमित कपाही हे सहसंस्थापक म्हणून भेटले. पुढे जाऊन ग्राहकांची समस्या सतत सोडवत असल्यामुळे कंपनीचा विस्तार वाढत गेला. कंपनीत कोणतीही नवीन गोष्ट करताना घाबरत नसल्याचे पियुष सांगतात. नवीन उद्योजकांना समस्या सोडवताना उद्योगासोबतच स्वतःत पण बदल करावेत असे ते सांगतात.
सप्टेंबर २०२० मध्ये कंपनीची ९०० पेक्षा जास्त स्टोअर होती. नवी दिल्ली येथे महिन्याला कंपनी कडून ३ लाख चष्म्यांचे उत्पादन केले जाते. कंपनीचा २०२२ वर्षाचा महसूल १५०३ कोटी रुपयांचा होता. शार्क टॅंक मध्ये एक हुशार शार्क म्हणून पीयूषकडे पहिले जाते.